महाराज...
मराठी मातीच्या पोरक्या झालेल्या भाळाला...
तुमच्या बाळानं पुन्हा एकदा आहेव लेणं दिलं ...आणि तुम्ही गेल्यानंतर पोरकी झालेली 'छत्रपतींची' गादी तितक्याच ताकदीनं पेलली आणि गौरवली तिची प्रतिष्ठा..
महाराज जगायचं कसं ते तुम्ही मराठी मातीला शिकवलंय..
मात्र तुमच्या बाळानं स्वराज्यासाठी निःस्वार्थपणे हसत हसत कसं मरायचं हे शिकवलं...
तो हरला नाही यमयातनांपुढे...यम ही हरला ...त्याच्या बलिदानापुढे ...
महाराज
जो औरंग्या स्वराज्य बुडवायला निघाला होता ...त्याच्या मयतीला पाच लोक पण नव्हते...
मात्र
भीमा ,भामा आणि इंद्रायणी धाय मोकूलन रडल्या होत्या...जेंव्हा तुमच्या बाळाचा श्वास विरून गेला होता या उनाड वाऱ्याच्या श्वासात.... तो वारा आजही मराठी मातीत लाखो वीर पैदा करतोय आणि तुमच्या लेकराचा विरलेला श्वास त्यांच्या धमन्यांमध्ये पेरतोय...
तुळापूर - वढुची माय मातीही गहिवरली होती....म्हणून त्याच्या रक्ताचा रंग तिनं भरून घेतलाय आपल्या कपाळावर मळवटासारखा...
संभाजीराजे म्हणजे शिवरायांचा पुढच रूप आहे हीच गोष्ट नेमकी विसरलो आम्ही....स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांच्या वारसांनी त्यांच्या बलिदानानंतर आपल्या कलम कसाई लेखणीने आपल्याच धन्याचं वर्णन केलं ' रगेल आणि रंगेल'
महाराज,
तुमच्या लेकरावरचा हा शिक्का पुसून टाकण्यासाठी विसावं शतक उजडावं लागलं...शेवटी राजर्षी शाहू छ्त्रपती नावाच्या 'आधुनिक शिवबाने' घडवलेल्या बहुजनांच्या लेकरांनी ...तुमच्या वारसदारांनी मुक्त केलं कलम कसायांच्या बिलोरी कैदेतून...
महाराज ...
तुमच्या लेकराचे औरंग्याने केलेले हालहाल काय कमी होते म्हणून आजही आम्ही धर्म ,जाती आणि विचारधारांची जहरी वाघनखं घुसवतो त्याच्या उरात आणि त्याचेच जयघोष करत मिरवतो...बधिर संवेदनेने...
महाराज ,
तुमचा बाळ मृत्युंजय होता...आणि येणाऱ्या हजारो पिढ्यांच्या काळजात तो स्वातंत्र्याची चेतना जिवंत ठेवणारा सूर्य बनून धगधगत राहील...
सागर सोनाई दगडू
No comments:
Post a Comment